"एखादी खोलवर झालेली जखम ,
वेदनेचा आकंत करणारी जखम ,आर्त किंकाळी फोडायला लावणारी जखम .
आणि अशा जखमेवर हळुवार मारलेली फुंकर .
ती फुंकर हवीहवीशी वाटणारी , पण क्षणभंगुर ,
वेदनेचा विसर पाडणारा त्यातला आपलेपणा ."
" माणसाचे आयुष्य अगदी असेच, त्या दुखऱ्या जखमेसारखे.ज्याप्रमाणे ती जखम नकोशी असते तसेच आपले आयुष्य हि आपल्याला बऱ्याचदा नकोसे होते. अशा वेळेस सगळ्या सुखांचा उबग येतो , वीट येतो.तेव्हा गरज असते ती आपल्या कोणाची तरी. मग ती व्यक्ती आपली आई,वडील,मित्र-मैत्रीण,आणि बऱ्याचदा प्रेयसी-प्रियकर कोणीही असते.त्यांच्या सहवासासाठी मन मोहरून जाते."
" एख्याद्याचा लागलेला लळा,एख्याद्याची झालेली सवय,तो तुटताना अनेकदा नरकयातना होतात.ज्यांच्या अंगाखांद्यावर आपले अवघे बालपण जाते,त्यांच्या पासून विभक्त होताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपण बऱ्याचदा पाहतो.मी सुद्धा पाहिले.पण मी ज्या वेळेला ते पाहिले त्यावेळेस माझे मन अगदीच कोवळे म्हणजे ९ वर्षांचे होते.पण त्या वेळेस सुद्धा ना मी डोळ्यातून पाण्याचा एक थेंब येऊ दिला,ना एक हुंदका येऊ दिला.नंतरच्या आयुष्यात खूप जणांचे दूर जाने मी अनुभवले. अर्थात करणे वेग वेगळी होती.त्यातले काही अंतराने दूर पण मनाने जवळ,तर काही जवळ असूनही मन नाही समजू शकले.आणि हो काही व्यक्ती तर परत कधी न येण्यासाठीच निघून गेल्या."" सुख दुखाचे अनेक उन्हाळे पावसाळे आपण सगळेच पाहतो.जीवन जगताना संकटे सर करत प्रत्येक जण जात असतो . या प्रवासात आपण कोणाला , तर कोणीतरी आपल्याला मायेचा हात देतो.दुखाचे कारण एवढेच कि आपल्या हातातील माया ज्याला दिलाय त्याला काळात नाही , तर कधी कधी आपल्याला मिळालेल्या हातातील मायेचा ओलावा आपल्यालाच कळत नाही. जाणते अजाणते पणात आपणच कुठल्या तरी खोलवर झालेल्या जखमेचे कारण असतो, तर कधी कोणीतरी आपलेच आपल्या मनावर जखमेचे घाव करून जातात.अशा जखमा होतात कारण त्यांच्या अस्तित्वाला मन मोहरून स्वाधीन होतं.
" आयुष्य असं का असतं?"
---माधव वणवे

Comments
Post a Comment